शिवशाहीतील स्त्रियांचा दर्जा
A)राजमाता जिजाबाई
B)महाराणी ताराबाई
C)महाराणी येसूबाई
D) उमाताई दाभाडे
इ.स. १६३०-१७०७ हा शिवशाहीचा कालखंड होय. छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याच्या भौगोलिक सीमा पाहता ते साम्राज्य फारच थोड्या भूप्रदेशांवर होते असे दिसते. आधुनिक महाराष्ट्राचा कुलाबा (रायगड) रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा बहुतेक भाग स्वराज्यात होता. त्याशिवय कर्नाटकात चंदीचे (जिंजी) राज्य होते. त्याशिवाय लहान-मोठे असे २४० दुर्ग त्यांच्या ताब्यात होते. शिवशाहीतील स्त्रियांचा दर्जा हा फक्त वरील भूप्रदेशापुरत्या सीमेअंतर्गत अभ्यासणे असा संकुचित अर्थ येथे अभिप्रेत नाही. त्यास महाराष्ट्र-कर्नाटक असा संदर्भ आहे.
भारतीय स्त्रियांचा दर्जा आणि महाराष्ट्रातील स्त्रियांचा दर्जा यात प्राचीन व मध्ययुगीन कालखंडात फारसा बदल झाला नाही. ब्रिटिश सत्ता येथे प्रस्थापित झाल्यानंतर १९ व्या शतकांतच स्त्रियांच्या एकूण दर्जामध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. भारतीय समाजजीवन १८ व्या शतकापर्यंत स्थितिशील, गतिशून्य होते. स्त्री जीवनात कोणतेही परिवर्तन झाले नाही. स्त्रियांची जी स्थिती स्वराज्यपूर्व काळात होती तीच शिवशाहीत होती. शिवशाहीत राजमाता जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई व इतर काही स्त्रियांना स्वत:चे कर्तृत्व दाखवण्याची संधी प्राप्त झाली.
१) पुरुषप्रधान संस्कृती ही शिवकाळातही असल्याने स्त्रियांना समाजात गौण, दुय्यम स्थान होते.
२) मुलीचा जन्म ही कुटुंबात आनंदाची बाब मानली जात नव्हती.
३) बालविवाहाची प्रथा शिवशाहीत पण अस्तित्वात होती. खुद्द राजे शिवाजी, राजे संभाजी, छत्रपती राजाराम, छत्रपती शाहू यांचे बालविवाहच झाले होते. राजकुटुंबांत सरदार वर्गात व एकूण समाजात बालविवाहच होत असत.
४) शिवशाहीतही बहुपत्नीत्वाची पद्धत होतीच. खुद्द छत्रपती शिवरायांची ८ लग्ने झालेली होती. विविध सरदार घराण्यांशी विवाह संबंध प्रस्थापित करून त्याचा उपयोग स्वराज्याच्या उभारणीसाठी करावयाचा हा लग्नामागचा हेतू होता. छत्रपती शिवाजीचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांचा विवाह प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाईशी झाला होता, तर संभाजीचा विवाह शृंगारपूरचे पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसूबाईशी झाला होता. खुद्द शिवरायांनी ८ विवाह केले ते तत्कालीन प्रसिद्ध सरदारांच्या घराण्यांशी.
५) शिवशाहीत बालविवाहाची प्रथा होती. शिवरायांचे जे ८ विवाह झाले होते त्या ८ ८ स्त्रिया वयाने लहानच होत्या. बालविवाह हे त्या काळी समाजात रूढ होते. परंपराच होती. त्यात काही चुकीचे आहे असे कोणासही वाटत नव्हते. संभाजी- येसूबाईच्या लग्नाच्या वेळी येसूबाईचे वय ५/६ वर्षे असावे. १६४१ मध्ये शिवाजीराजांचे लग्न पुण्याच्या लाल महालामध्ये फलटण येथील निंबाळकर घराण्यातील सईबाईशी झाले होते.
६) शिवशाहीतही सतीची पद्धत होती; पण पेशवाई कालखंडाच्या तुलनेत शिवशाहीत सतीची उदाहरणे कमी दिसतात. शिवाजीच्या मृत्यूनंतर पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या. या पुतळाबाई मोहिते कुटुंबातल्या इ.स. १६५३ मध्ये पुतळाबाईचा शिवाजीशी विवाह झाला होता. त्यांचे सर्व आयुष्य व्रतवैकल्ये, देवधर्म यात गेले. शिवाजीच्या मृत्यू वेळी ८ पैकी ३ जणी जिवंत होत्या. पुतळाबाई, सोयराबाई व सकवारबाई. छत्रपती राजारामाच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकांपैकी अंबिकाबाई ही विशाळगडावर सती गेली होती.
७) विधवांची स्थिती अत्यंत वाईट होती. सततची युद्धे व साथींचे रोग यामुळे विधवांची संख्या मोठी असावी. युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या विधवा बायकांचे जीवन कसे होते याबाबतचे निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत. विधवांची स्थिती वाईटच असणार. काबाडकष्ट करून कसेबसे जीवन विधवा जगत असणार हे उघडच आहे.
शिवाजीचे सईबाईशी लग्न १६४१ मध्ये झाले. शिवाजीराजे-सईबाई यांना पहिल्या ३ मुली झाल्या व चौथे अपत्य म्हणजे संभाजी. संभाजीचा जन्म १४ मे १६५७ चा. पुरंदर किल्ल्यावर झाला. पुढे दोन वर्षांनी ती मृत्यू पावली. मृत्यूपूर्वी सईबाई कित्येक महिने आजारी होत्या.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात पट्टराणीचा मान सोयराबाईस मिळाला होता. सर्व रायगडावर त्यांची हुकूमत चालत असे. शिवाजीच्या मृत्यूनंतर मात्र त्यांना विपरीत स्वप्ने पडली. संभाजीराजाचा हक्क डावलून धाकट्या राजारामास त्यांनी गादीवर बसवले; पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. काहींच्या मते त्यांना संभाजीराजांनी भिंतीत चिरडून ठार केले, तर काहींच्या मते त्या पुढे दीड वर्ष जिवंत होत्या.
शिवशाहीतील कर्तृत्ववान महिला
A) जिजाबाई : भारताला कीर्ती व वैभव प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रपुरुषांची चरित्रे सर्वांना माहीत आहेत; पण त्यांच्या मातांची चरित्रे व कार्य याची माहिती मात्र फारशी उपलब्ध नाही. युगपुरुष शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई अशा मातांपैकीच एक आहेत. शिवाजी महाराजांना स्फूर्ती देऊन मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी अत्यंत समर्थपणे केल्यामुळेच शिवाजी महाराजांना शून्यातून स्वराज्याची निर्मिती करता आली. त्यांनी शहाजी राजांचे शिवाजी राजाकडे दुर्लक्ष होत असतानाही 'शिवाजी' राजांना घडविले व अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळे वळण देण्याची कामगिरी बजावली.
जिजामाता यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी लखुजी जाधव व गिरजाबाईच्या पोटी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. जिजाबाईला लहानपणापासूनच राजकीय पार्श्वभूमी लाभली होती. जिजाबाईचे शिक्षण तत्कालीन, पारंपारिक रूढीप्रमाणे आणि राजघराण्यातील प्रथेप्रमाणे झाले होते. जिजाबाईस मुळाक्षरांचे शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांच्या आई-वडिलांनी केली होती. तसेच पौराणिक पद्धतीचे संस्कार, रामायण-महाभारतातील कथानके आणि दक्षिणेत पूर्वी होऊन गेलेल्या शालिवाहन, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि विजयनगरचे साम्राज्य इत्यादीची माहिती करून दिली होती. जिजाबाईचे वडील लखुजी जाधव हे अत्यंत पराक्रमी, महत्त्वाकांक्षी व कुलाभिमानी सरदार होते. लखुजी जाधव हे स्वत:ला देवगिरीच्या यादवांचे वंशज समजत. इ. स. १५५० मध्ये ते जन्मास आले असावेत. शिवपूर्व काळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही व आदिलशाहीच्या आश्रयाने जी काही मराठा कुळे उदयास आली त्यात सिंदखेडचे जाधव, वेरूळचे भोसले, फलटणचे पवार-निंबाळकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. लखुजी जाधव यांची समाधी सिंदखेडराजा येथे असून तिला घुमट आहेत व या घुमटांच्या पूर्व व उत्तर दरवाजावर दोन शिलालेख आहेत. त्यातील मजकुरावरून लखुजी जाधव यांच्या आईचे नाव ठकाबाई व वडिलांचे नाव विठोजी होते. लखुजीला ३ बायका होत्या. त्यापैकी गिरजाबाई ही जिजाबाईची आई होती. लखुजी जाधवांना ४ मुलांनंतर जिजाबाई झाल्या होत्या. आपणास कन्या व्हावी यासाठी जिजाबाईच्या आईने नवस केल्याचा उल्लेख एका पोवाड्यात आहे. लखुजी जाधव हे अत्यंत मुत्सद्दी, कर्तबगार होते. निजामशाहीत ते पंचहजारी मनसबदार होते. पुढे त्यांना सिंदखेडची 'देशमुखी' मिळाली. सिंदखेडला स्थायिक झाल्यानंतर दहा हजारी मनबसदारी, २८ महाल व ५२ चावड्यांचे वतन मिळाले. विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार म्हणून ते ओळखले जात. इ.स. १५९४ १६०० या काळात सम्राट अकबराने निजामशाही बुडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती वाचवण्याचे श्रेय काही प्रमाणात लखुजी जाधव यांच्याकडे जाते. पुढे इ.स. १६२९ मध्ये लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र व एक नात व एक नातू यांची हत्या दौलताबाद मुक्कामी निजामशहाच्या उपस्थितीत झाली. अदूरदर्शी व मद्यपी निजामशहाने त्याच्या सरदारांचे ऐकून हे हत्याकांड घडवून आणले होते. तसेच लखुजी जाधव व शहाजी राजे यांचे झालेले नातेसंबंध, स्नेह व दोघांचे निजामशाहीत परतणे हे निजामशाहीतील मुस्लिमांना न आवडल्याने हे हत्याकांड घडून आले. या हत्याकांडामुळे जिजाबाईवर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यांचे माहेरचे छत्र हरवले होते. शहाजीराजे यांनी चिडून निजामशाहीचा मुलूख लुटण्यास प्रारंभ केला. निजामशाहीत फंदफितुरी वगैरे संकटे त्यांनी उभी केली. त्यामुळे निजामशाहीतील सरदार फुटून काही मोगलशाहीत तर काही आदिलशाहीत गेले.
जाधव घराणे व भोसले घराणे यांच्यात जिजाबाई शहाजीच्या रूपाने जो विवाहसंबंध झाला त्यामुळे दोन्ही घराण्यांचा लौकिक वाढला होता. या विवाहासंबंधी बखर साहित्यात काही नोंदी आल्या आहेत. त्यानुसार लखुजी जाधवांच्या बायकांचा जिजाबाई भोसल्यांच्या कुळास द्यावयास विरोध होता. भोसल्यांनी बळजबरीने जिजाबाईला आपल्या कुळास द्यावयास भाग पाडले. जाधव-भोसले वैराच्या कथा ज्या बखरकारांनी दिल्या आहेत त्यात एकवाक्यता नाही. समकालीन साधन 'शिवभारत'कारांच्या नोंदीनुसार "उत्तम लक्षणांनी युक्त दानशील, दयाशील, युद्धकुशल, महातेजस्वी अशा मालोजीपुत्र शहाजीला पाहून कुबेरागत श्रीमंत जाधवरावांनी ज्योतिषाने सांगितलेल्या, अनुकूल ग्रह असलेल्या शुभमुहूर्तावर आपली विजयलक्षणा कमलनेत्रा व कुलास शोभा आणणारी कुलवान कन्या जिजाऊ वरदक्षिणेसह शहाजीस अर्पण केली. रामसिंग भाट व बजरंग भाटाच्या कवनातील माहितीनुसार जिजाबाई ५ वर्षांची व शहाजीराजे ८ वर्षांचे असताना शहाजी व त्यांचे वडील सिंदखेडराजा येथे दरबारी आले असता जिजा-शहाजी गुलाल खेळू लागले तेव्हा मालोजीराजे आनंदाने मोठ्याने ओरडून म्हणाले, "मंडळी, ऐकलंत का? झाला प्रकार पाहिलात ना? जाधवराव आमचे व्याही झाले. जिजा आमची सून झाली.' बखरकारांनी जाधव-भोसले वैर गृहीत धरून लग्नप्रसंगी केलेली मांडणी चुकीची आहे. जिजाबाई-शहाजी राजे यांचे लग्न इ.स. १६१० च्या सुमारास चांगल्या वातावरणातं व रूढीप्रमाणे झाले होते. "जिजाबाई-शहाजीला एकूण ६ पुत्र झाले. त्यापैकी संभाजी व शिवाजी हे दोघे जगले. बाकी ४ अल्पजीवी होते. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून नाव ठेवले ‘शिवाजी' असे कवी परमानंद लिहितो. परंतु शिवनेरी किल्ल्यावर श्री भवानी शिवाईदेवी ही नवसाला पावली म्हणून पुत्राचे नाव शिवाजी ठेवले असे बखरकार म्हणतात.
इ.स. १६३६ मध्ये शहाजीराजांनी कर्नाटक हे स्वत:चे कार्यक्षेत्र निश्चित केल्यानंतर जिजाबाईला पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी बालशिवाजी व दादोजी कोंडदेव यांच्यासोबत ठेवले. इ.स. १६३०-३२ या काळातील भीषण दुष्काळ, इ.स. १६३४ ३६ या काळातील मोगली आक्रमण, विजापूरकरांनी पुणे जहागिरीवर केलेले हल्ले आदींमुळे पुणे परगणा बेचिराख झाला होता. शहाजीराजांचे पुण्यातील वाडे बेचिराख झाल्याने कोठे राहावयाचे हा प्रश्न होता. पुण्याच्या दक्षिणेस सात कोसांवर खेडेबारे येथे दादोजींनी जागा विकत घेऊन शिवाजी राजे व जिजाबाईसाठी वाडा बांधला. जिजाबाईनेच खऱ्या अर्थाने शिवाजी राजे घडविले. रामायण-महाभारतातील कथा जिजाबाईने बालशिवाजीस ऐकविल्या. हिंदूंचे मुसलमानांकडून होणारे धर्मांतर, गोहत्या, मंदिरांचा विध्वंस हे चित्रही त्यांनी शिवाजी राजापुढे उभे केले. बालमन हे अत्यंत संस्कारक्षम असते. या वयातच जिजाबाईने शिवाजी राजाचे मन घडविले. अन्यायाचा तिरस्कार व प्रतिकार करण्याची शिवाजी राजाची मानसिकता तयार करण्यामागे जिजाबाईचे योगदान मोठे होते यात शंकाच नाही. जिजाबाईने स्मृतिपुराणे, विविध शास्त्रे व राजनीती आदींचेही शिक्षण शिवाजी महाराजांना दिले होते.
जिजाबाईच्या अंगी अनेक गुण होते. ती पतिव्रता, विचारी, धीरगंभीर, परोपकारी स्त्री होती. जिजाबाईच्या परोपकारी स्वभावामुळे ती पुणे जहागिरीतील लोकांचे आदरस्थान बनली. शिवाजी महाराजांच्या मनात स्वदेश व स्वधर्माबद्दल जो ओढा, आकर्षण निर्माण झाले होते ते करण्यास जिजाबाईच कारणीभूत होती. स्वतः जिजाबाई अत्यंत धर्मनिष्ठ होत्या. आळंदीच्या ज्ञानदेवाच्या पूजेअर्चेसाठी नंदादीपांची व नैवेद्याची उत्पन्ने त्यांनी लावून दिली होती. पुण्यातील दर्गे-मशिदी यांचीही चोख व्यवस्था त्यांनी ठेवली होती. आदिलशहाकडून मिळालेल्या जहागिरीच्या प्रदेशांची पुन्हा व्यवस्था करणे हे अत्यंत कठीण काम होते. पण जिजाबाई यांनी ते आव्हान स्वीकारले होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याइतके हे काम अवघड होते. पुणे जहागिरीची व्यवस्था जिजाईने अत्यंत कुशलतेने सांभाळली. याचा अर्थ त्यांच्यात प्रशासकीय गुण होते. हेच प्रशासकीय गुण शिवाजी महाराजांनी घेतले होते. मोगल बादशहाने शिवाजीराजे व त्यांचे पुत्र शंभूराजे या दोघांना आग्रा येथे कैदेत ठेवले होते. आग्रा येथून परत येईपर्यंत स्वराज्याचे शासन सुरळीतपणे जिजाबाईंनी चालविले होते.
जिजाबाईचे जीवन तसे एका अर्थाने अनेक संकटांनी भरलेले दिसते. वडील, दोन भावांची निजामाकडून झालेली हत्या, पुत्र संभाजीचे निधन, पतीचा अल्पसहवास, पुण्यासारख्या ओसाड जहागिरीची जबाबदारी, पुत्रावर आदिलशहा व मोगलांकडून होणारे वारंवार हल्ले पाहता तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करवत नाही. वीरता, धैर्य, समजूतदारपणा, सोशिकपणा, विनय, पतिनिष्ठा, पुत्रप्रेम इ. गुण त्यांच्या अंगी असल्यामुळे त्या या संकटांवर मात करू शकल्या. सर जदुनाथ सरकार यांनी “जिजाबाईचे तारुण्य संपल्यामुळे व तुकाबाई या नवीन सुंदर मुलीशी विवाह झाल्यामुळे शहाजी राजाने जिजाबाईला टाकून दिले” असे विधान केले आहे. पण ते वस्तुस्थितीवर आधारलेले नाही. पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पाहणे व शिवाजी राजांच्या सुरक्षिततेसाठी आणि संगोपनासाठी कोणी तरी मायेचा माणूस ठेवणे आवश्यक होते. म्हणून जिजाबाईला शिवाजी राजासोबत पुण्यास ठेवण्यात आले होते. शहाजी राजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्वासू, अमात्यं. पराक्रमी सरदार पाठविले होते. विविध शास्त्रांत व कलामध्ये निष्णात असणारा अध्यापक वर्गच शिवाजी राजाबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. आपल्या पतीच्या पराक्रमावर, धाडसावर तिची पूर्ण श्रद्धा होती. पुणे जहागिरीतील प्रजेस न्यायनिवाडा देण्याचे कामही तिने पाहिले. तसेच तिने काही सनदाही दिल्या होत्या. शहाजी राजास पेचात पकडण्यासाठी मोगल सरदार महाबतखान याने एका सरदारामार्फत जिजाबाईला अटक केली; पण जिजाबाई घाबरल्या नाहीत. जिजाबाईचा चुलता मोगलांच्या दरबारी असल्याने त्याच्या प्रयत्नांतून जिजाबाईची सुटका झाली. मोगलांशी लढा देण्याची महत्त्वाकांक्षा व इच्छा जिजाबाईने मनाशी बाळगली होती. त्या दिशेने व त्यांनी शिवाजी राजावर संस्कार केले होते. जिजाबाईची ही इच्छा पुढे शिवाजी महाराजांनी पूर्ण केली.
जिजाबाईबद्दल इतिहासकारांचे अभिप्राय : जिजाबाईच्या कामाचे, चरित्राचे मूल्यमापन अनेक इतिहासकारांनी केलेले आहे. गो. स. सरदेसाई यांच्या मते, “शिवाजीला योग्य ते प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून मराठ्यांचे स्वराज्य स्थापण्याची इच्छा जिजाबाईने पूर्ण करून घेतली. नानाविध विपत्ती सहन करून जो हा सुयोग तिने घडवून आणला त्यामुळे महाराष्ट्राचा भाग्योदय झाला." भारताचार्य चिंतामणराव वैद्य म्हणतात, शिवाजी महाराजांची मातृभक्ती विलक्षण होती. सुदैवाने जिजाऊसारखी पूज्य, नि:स्पृह, करारी, सद्गुणी अशी त्यास मातुश्री लाभली होती. तिची भक्ती ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला व कोणतीही गोष्ट तिला विचारल्याशिवाय केली नाही.' महादेव गोविंद रानडे यांनी 'Rise
of Maratha Power' या ग्रंथात म्हटले आहे, “जिजाबाई केवळ थोर कुळात उत्पन्न झाली व तिचा शरीरसंबंध (लग्न) थोर घराण्याशी झाला होता या एवढ्याच गोष्टीवर तिची थोरवी अवलंबून नव्हती. तिच्या थोरपणास तिच्या अंगचे गुणच कारणीभूत होते. शिवाजीचे जिजाबाईवर अतोनात प्रेम होते. प्रत्येक गोष्टीत तो जिजाबाईचा सल्ला घेई. जिजाबाईने पाजलेल्या बाळकडूनेच स्वकर्तव्याची त्यास पूर्ण ओळख करून दिली. कोणत्याही अवघड कामगिरीवर जावयाचे असले म्हणजे शिवाजी प्रथम आईचा आशीर्वाद घेत. शिवाजी महाराजांच्या उदयास बहुतांशी " त्याची आई जिजाबाईच जबाबदार होती. कै. वासुदेवशास्त्री खरे यांनी 'शिवसंभव' य नाटकात जिजाबाईची तेजस्वी व्यक्तिरेखा रंगविली असून शिवाजी महाराजांच्या ठाय स्त्री जातीबद्दल जो इतका आदर होता त्याचे मुख्य कारण त्याची स्वतःची आदर्श मात होय असे म्हटले आहे. सेतू माधवराव पगडी यांच्या मते, "
आपल्या विख्यात पुत्राच्य आयुष्यभर चाललेल्या संघर्षात जिजाबाई ही त्यास स्फूर्ती देणारी शक्ती ठरली. परस्परांव निष्ठा व माया असणाऱ्या माता-पुत्रांची अशी उदाहरणे इतिहासात क्वचितच आढळतील. शिवाजी महाराजांना वडिलांचा क्वचित सहवास लाभला. त्यामुळे आई, वडील, भाऊ, बहीण, शिक्षक, मार्गदर्शक इ. सर्व नाती जिजाबाईलाच वठवावी लागली.
जिजाबाईने रणांगणावर पराक्रम केला नसला तरी शिवाजी राजासारख्या पुत्रास जन्म दिला. शिवाजीची जडणघडण केली म्हणून तिचे नाव इतिहासात नोंदविले गेले आहे. शिवरायांना युद्धोपयोगी कला शिकविण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली होती. शिवरायांच्या मनात साहस, शौर्य, मर्दुमकी, सदाचार इ. गुण वाढीस लावण्याचे काम जिजाऊंनी केले. पती निधनानंतर सती जाण्याचा जिजाबाईचा मानस होता; पण शिवाजी राजांनीच आई जिजाबाईला सती जाण्यापासून परावृत्त केले. जिजाबाई धर्मनिष्ठ होत्या; पण अंधश्रद्धा बाळगणाऱ्या नव्हत्या. जिजाबाईंनी पुण्यात कसबा पेठेत गणपतीची स्थापना केली आणि जोगेश्वरी व केदारेश्वर मंदिरांचाही जीर्णोद्धार केला. शिवाजी राजाने स्वतंत्र राज्य स्थापन करावे हे जिजाबाईचे स्वप्न होते. ते स्वप्न शिवाजी राजाच्या राज्याभिषेकाने साध्य झाले. त्या एका अर्थाने तृप्त, आनंदी व समाधानी झाल्या होत्या. आपला पुत्र एक स्वतंत्र राज्याचा 'छत्रपती' झाला हे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी त्या मृत्यू पावल्या.
अशा या जिजाबाईचे व्यक्तिमत्व रेखाटताना शहाजी राजांच्या दरबारातील कवी जयराम पिंडये यांनी म्हटले आहे की,
जशी चंपकेशी खुले फुल्लजाई । भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥
जिचे किर्तिचा चंबु जंबुद्विपाला । करी सावली माऊलीसी मुलाला ॥
वरील जिजाबाईच्या कर्तृत्वाचे समकालीन कवीने केलेले वर्णन खरोखरच सार्थ आहे.
B) महाराणी
येसूबाई
मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांचे वेगळेच स्थान आहे. दाभोळ प्रांतातील शृंगारपूरचे पिलाजीराव शिर्के (देशमुख) या सरदारांची ती कन्या होती. इस. १६६४-६५ मध्ये संभाजी व येसूबाई यांचा विवाह. झाला. लग्नाच्या वेळी येसूबाईचे वय फक्त ५/६ वर्षांचे असावे. ५/६ वर्षांपासूनच त्यांना जिजाबाईचा सहवास लाभला. जिजाबाईचा सहवास व संस्कार यामधून येसूबाईची जडणघडण अगदी गृहशिक्षणापासून ते राजनीतीपर्यंत झाली. मराठी राज्याची उभारणी होत असताना शिवछत्रपतींच्या राजकारणाचे आणि राजनीतीचे जवळून निरीक्षण करण्यासाठी संधी येसूबाईंना मिळाली. येसूबाईंना शिवरायांच्या कारकीर्दीमध्येच दोन प्रसंगांना सामोरे जावे लागले. औरंगजेबच्या आग्रा भेटीस गेल्यानंतर शिवाजीबरोबर संभाजीलाही तेथे कैद केले गेले होते. शिवाजी महाराज परत आले; पण संभाजीराजे मात्र उत्तरेकडेच काही काळ राहिले. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग म्हणजे स्वराज्याची भरभराट होत असतानाच येसूबाईचे संभाजीराजे मोगल सरदार दिलेरखानास जाऊन मिळाले. हे संकट जसे स्वराज्यावर होते तसेच राज्यघराण्यावर होते. या दोन्ही प्रसंगी येसूबाईची किती मानसिक कोंडी झाली असेल याची कल्पना करवत नाही. संभाजीराजे मोगलांकडे गेले तेव्हा येसूबाई शृंगारपुरी येथेच राहिल्या. नंतर दीड महिन्यांनी (२९ जानेवारी १६७९) त्यांना कन्या झाली. तिचे नाव भवानी ठेवण्यात आले. संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले असले तरी काही काळातच मोगल सत्तेचे खरे स्वरूप त्यांच्या लक्षात आले व ते पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. पुन्हा इ.स. १६८२ मध्ये येसूबाईच्या पोटी शाहूराजांचा जन्म झाला. संभाजीला छत्रपती झाल्यानंतर अनेक संकटांचा सामना करावा लागला. संभाजीला सतत युद्धावर जावे लागे. तेव्हा अशा प्रसंगी येसूबाईवर प्रशासनाची काही जबाबदारी टाकण्यात आली होती. ती जबाबदारी तिने यशस्वीपणे पार पाडली होती. त्या आपल्या नावे राजपत्रेही काढत.
सन १६७९ मध्ये छत्रपती संभाजी संगमेश्वर येथे मुक्कामाला असताना त्यांना व कविकलश यांना पकडून औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ सुरू केला. त्या छळाच्या बातम्या व संभाजीचा वध या बातम्या ऐकून येसूबाईवर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. आपल्या अल्पवयीन पुत्रास गादीवर बसवून स्वत: राज्यकारभार करणे तिला शक्य झाले असते; पण महाराणी येसूबाईने छ. राजाराम महाराज यांना स्वराज्याची गादी दिली हे तिचे मोठेपण होय. संभाजी महाराजांच्या कैदेनंतर मराठ्यांचे एकूण धोरण ठरविण्यात रायगड लढविण्यात व नंतर सन्माननीय वाटाघाटी करून तो मोगलांच्या ताब्यात देण्यात येसूबाईचा पुढाकार होता. रायगड घेतल्यानंतर (इ.स. १६८९) जुल्फिकारखान येसूबाई, शाहूराजे व इतर राजकैदी यांना औरंगजेबच्या स्वाधीन केले. औरंगजेबने त्यांच्या निवासाची सोय करून सर्व सुखसोयी दिल्या; पण त्यांच्यावर सतत नजरकैद ठेवली होती औरंगजेबाने संभाजीस ठार मारले; पण त्यांचा पुत्र शाहू व राणी येसूबाई यांना सन्मानाने वागविले. येसूबाई व इतर राजबंद्यांची मुक्तता इ.स. १७१९ मध्ये झाली. म्हणजे २८ वर्षे येसूबाई मोगलांच्या कैदेत होत्या. कोणत्याही मराठा स्त्रीच्या नशिबी एवढी प्रदीर्घ वर्षाची नजरकैदेची शिक्षा आली नसावी.
स्वराज्यात परत आल्यावर आपल्या पुत्राचा (छ. शाहू) अभ्युदय पाहून त्यांना कृतकृत्य वाटत होते. जीवनाच्या शेवटच्या टप्यावर मात्र त्या समाधानी होत्या. राजकारणातून त्या निवृत्त झाल्या असल्या तरी आपल्या पुत्राशी त्या सल्लामसलत करत असाव्यात. इ.स. १७३१ मध्ये त्यांचे निधन झाले. स्वराज्यनिष्ठा, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची साहसी वृत्ती, स्वाभिमानीपणा, जिद्दीपणा इ. गुण त्यांच्या अंगी होते. शत्रूच्या छावणीत असताना त्यांनी उपासमारही सहन केली. आपल्या पुत्राच्या वैभवाच्या उत्कर्ष दर्शनाने त्यांच्या आयुष्याचा शेवट मात्र गोड झाला. संभाजीच्या मृत्यूनंतर रायगड मोगलांच्या स्वाधीन करेपर्यंत तिने धैर्य व मुत्सद्देगिरी दाखविली होती.
श्री. अशोकराव शिंदे सरकार यांनी 'महाराणी येसूबाई साहेब' हा छोटा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात येसूबाईच्या जीवनकार्याचा आढावा त्यांनी घेतला आहे.
डॉ. कमल गोखले 'शिवपुत्र संभाजी' या ग्रंथात म्हणतात, “येसूबाईने तिच्यावर आलेल्या संकटांना धैर्याने तोंड दिले. भोसले घराण्याची सून शोभेल अशीच वर्तणूक तिने शेवटपर्यंत ठेवली. संभाजीराजांच्या सहवासात असताना येसूबाईने सर्व सहकार्य संभाजीराजीरांना दिले. संभाजी व येसूबाई ही जोडी आपल्या धैर्याने, कर्तृत्वाने, कणखर बाण्याने मराठ्यांच्या इतिहासात अमर झाली आहे.” वा. सी. बेंद्रे 'छत्रपती संभाजी महाराज' या ग्रंथात म्हणतात, "वीरस्नुषा, वीरकन्या, वीरपत्नी व वीरमाता म्हणून येसूबाईचे कार्य व कर्तृत्व फार मोठे आहे.” सौ. वसुधा पवार, वि. का. राजवाडे यांनीही येसूबाईंच्या कार्याचा गौरव केला आहे.
C)महाराणी ताराबाई :
मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटपर्यंत शिवाजी महाराजांची सून व राजाराम महाराजाची विधवा पत्नी ताराबाईने पराक्रम गाजविला. शौर्य, धाडस, मुत्सद्दीपणा, पराक्रम, राजकारणपटुत्व हे गुण तिच्या अंगी होते. ताराबाईने सर्व कारभार आपल्या हे हाती घेतला होता. सरदारांच्या नेमणुका, त्यांच्या बदल्या, राज्याचा कारभार, मुलखावरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्राने चालू लागल्या. आपल्या सरदारांची मन तिने आपल्याकडे वळवून घेतली होती. बादशाही भीमसेन सक्सेना म्हणतो, “राजारामाची बायको ताराबाई हिचा आपल्या नवऱ्यापेक्षाही अधिक दरारा होता.” औरंगजेबाचे स्वराज्यावरील संकट परतवून लावताना ताराबाईला स्वकियांशीही झगडावे लागले. ताराबाईचे वय फक्त २५ वर्षांचे होते. तेव्हा ती विधवा झाली. तिच्या तुलनेत रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, परशुराम त्र्यंबक, नेमाज शिंदे, परसोजी भोसले, हिंदुराव घारेपडे इ. सरदार मंडळी वयाने अनुभवाने किती तरी ज्येष्ठ होती व इ.स. १७०० च्या सुमारास या सर्व सरदारांच्या नावावर मोठमोठे पराक्रम नोंदवले गेले होते. या सरदार मंडळीत एकमेकांबद्दल द्वेष होता; पण ताराबाई ही कोणा एका सरदाराच्या हातातले बाहुले न बनता तिने स्वतंत्रपणे कारभार पाहिला. तिच्यात निर्णयक्षमता, सत्ता गाजविण्याची महत्त्वाकांक्षा हे गुण होते. ताराबाईच्या काळात रामचंद्रपंत अमात्य हे तत्त्वनिष्ठ व स्वतंत्र स्वभावामुळे मागे पडले व परशुराम त्र्यंबक व शंकरजी नारायण यांचे महत्त्व वाढले होते.
ज्योतीने ज्योत पेटवावी त्याप्रमाणे ताराबाईने विविध मराठा सरदारांना जी पत्रे लिहिली ती पाहता त्या पत्रांद्वारे तिने मराठा सरदारांच्या अंतःकरणात प्रतिकाराचा ज्वालामुखी कसा पेटविला व ज्वालामुखी तिच्या मनातही धगधगत होता हे दिसते. दक्षिणेत औरंगजेब मराठ्यांशी लढण्यात गुंतला असता उत्तरेत नेमाजी शिंदे, गुजरातमध्ये धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली मराठा फौज घुसवण्याची जी दूरदृष्टी दाखविली ती अभूतपूर्व अशी होती. किल्ले मोगलांच्या ताब्यात देऊन तिने आपल्या (मराठा) लोकांना श्रीमंत होऊ दिले. किल्ला ताब्यात देण्यापूर्वी मोगली फौजेवर हल्ले करून त्यांना कमकुवत केले. नंतर मोगलांच्या ताब्यातील किल्ले पुन्हा जिंकून घेतले. जे किल्ले जिंकायला औरंगजेबाला ६ वर्षे लागली ते तिने २ वर्षांत जिंकले. प्रमुख सरदार मंडळीत आपापसांत मतभेद असतानाही ताराबाईने त्या सर्वांचा उपयोग स्वराज्यासाठी करून घेतला. मातब्बर माणसे तर जवळ बाळगायची, त्यांचा उपयोग तर करावयाचा; पण नाकापेक्षा मोती जड होऊ द्यायचा नाही हे अंतर्गत राजकारण चालविण्याचे अवघड तंत्र ताराबाईने आत्मसात केले होते यात शंका नाही. संकटाच्या काळी जिवाला जीव देणारे सहकारी ताराबाईला जोडता आले नाहीत हे तिचे वैगुण्य ठळकपणे नजरेस आल्याशिवाय राहत नाही. यात तिच्या कठोर, करारी, हुकुमत गाजवू पाहणाऱ्या तुसड्या व हेकेखोर स्वभावाचा बराच भाग असावा असे वाटते, असे मत प्रा. शं. श्री. पुराणिक यांनी 'मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथात व्यक्त केले आहे.
ताराबाईच्या स्वभावाला मर्यादा होत्या. तिने स्वार्थ एवढाच पाहिला की, महाराष्ट्राचे राज्य हे आपले व आपल्या मुलाचे आहे अशी तिची धारणा होती. ताराबाई ही एकतंत्री सत्ता गाजविणारी हुकूमशहाच होती; पण तिने ही सारी सत्ता स्वराज्याच्या कल्याणासाठीच वापरली हे नाकबूल करता येत नाही. राजाराम महाराजाची उदात्त वृत्ती, समर्पणशीलता हे गुण ताराबाईच्या अंगी नव्हते; परंतु कर्तृत्व, हिंमत, धैर्य, स्वार्थत्याग हे अंगी होते. नेपोलियनने म्हटले होते, "फ्रेंच राजवंशाचा मुकुट हा धुळीत पडला होता. तो मी पराक्रमाने जिंकून माझ्या खांद्यावर ठेवला." ताराबाईला हे विधान काही अंशी लागू पडते. गुण तिच्या अत्यंत कठीण परिस्थितीत ताराबाईने कारभार पाहिला. पती राजाराम महाराजाचे निधन झालेले, पुत्राचे वय १४ वर्षांचे, संभाजीपुत्र शाहू हे मोगलांच्या कैदेत व मराठा सरदारांत असलेली वतनाची आसक्ती या पार्श्वभूमीवर ती सत्तेवर आली होती. सर्व मराठा सरदारांना एका सूत्रात गुंफून त्यांच्याकडून तिने स्वराज्याचे कार्य करवून घेतले. कल्पकता, आक्रमकता व आत्मविश्वास या गुणांच्या सामर्थ्यावर तिला यश प्राप्त झाले होते. मराठ्यांचे शक्तिस्थान म्हणजे किल्ले लढवण्याचे औरंगजेबाने ठरविले तेव्हा ताराबाईने एक नवीच युद्धनीती अमलात आणली होती. एक-एक किल्ला ४-६ महिने लढवायचा, औरंगजेबाचे लष्करी साहित्य व सामर्थ्य खच्ची करावयाचे, पैसा घेऊन किल्ला मोगलांच्या ताब्यात द्यावयाचा व पुन्हा एक एक किल्ला जिंकावयाचा ही ती युद्धनीती होती. औरंगजेबाने सर्व सामर्थ्य खर्च करूनही मराठ्यांच्या विरुद्ध २५ वर्षांपासून चालत असलेल्या लढ्यात शेवटी त्याला अपयश आले. डॉ. ब्रिजकिशोर म्हणतात, "औरंगजेब व ताराबाई यांच्यात सतत ७ वर्षे चाललेले द्वंद्व हे देशाच्या इतिहासातील सर्वात रोमांचकारी प्रकरण म्हणून इतिहासात कायमचे नोंदवले जाईल.”
B)उमाताई दाभाडे :
सेनापती खंडोजीराव दाभाडे यांनी छ. राजाराम व महाराणी ताराबाई यांच्या काळात स्वराज्य रक्षण करण्याच्या कामी मोठे योगदान दिले होते. दक्षिणेतील जिंजीपासून उत्तरेकडील दिल्लीपर्यंत खंडेराव दाभाडे यांनी पेशव्यांचे सेनापती म्हणून मोठा लौकिक मिळवला होता. त्यांच्या पत्नीचे नाव उमाताई दाभाडे. उमाताईचा पुत्र त्र्यंबकराव दाभाडे यास शाहूंनी सेनापतिपदाची वस्त्रे बहाल केली. पण त्र्यंबकाव दाभाडे गुजरातमध्ये पेशव्यांच्याच फौजेतील शिलेदाराकडून चुकून गोळी लागल्याने मारले गेले. उमाबाई ही एक बाणेदार व पराक्रमी स्त्री होती. गुजरात सुभ्यातील अहमदाबादचे ठाणे दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यात होते. शाहूंच्या आज्ञेनुसार उमाबाईने आपल्या पुत्रासह अहमदाबाद ठाणे जिंकण्यासाठी मोहीत हाती घेतली व अहमदाबाद काबीज केले. ती सातारा येथे आल्यावर स्वतः शाहूंनी उमाबाई दाभाडेचा गौरव केला. तिच्या पराक्रमाचे कौतुक करून तिला शाहू छत्रपतींनी सोन्याचे तोडे भेट दिले होते. यापूर्वी व . नंतरही असा मान कुणाच्या वाटणीस आल्याची नोंद इतिहासात नाही. मराठ्यांच्या इतिहासातील शूर, पराक्रमी, यौद्धी म्हणन उमाबाई भी ओळख आहे