![]() |
किरण बेदी |
पोलिसदलातील प्रखर तारा किरण बेदी
* १९८२ साल. दिल्लीला आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. आशिया खंडातले अनेक खेळाडू, प्रेक्षक या निमित्ताने भारताच्या राजधानीत यायचे होते. भारताची शान यांच्या माध्यमातून आशिया खंडभर पोचणार होती. त्यासाठी पंतप्रधानांपासून सारेच तयारीला लागले होते. एक मोठी समस्या होती ती दिल्लीतील वाहतुकीच्या गलथानपणाची. प्रचंड लोकसंख्या, विविध प्रकारची असंख्य वाहने, लोकांचा बेशिस्तपणा, पोलिसांची काही अंशी बेपर्वाई आणि काही अंशी अगतिकता, सारीच या समस्येला जबाबदार होती. पण या वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी एक डी. सी. पी. अधिकारी मात्र झटत होती. स्वत: गाडीतून हिंडून ध्वनिक्षेपकावरून लोकांना सूचना देणे, शिस्त लावणे, वाहने नीट उभी करण्याबाबत सूचना देणे ह्या साऱ्या बरोबरच सिग्नलच्या वेळा तपासणे, नादुरुस्त सिग्नलची नोंद, त्यांची ताबडतोब दुरुस्ती ही कामेही ती तत्परतेने करत होती. नियमांचा भंग करणाऱ्यांवर लगेच कारवाई करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी ती उभी राहायची. त्या बाबत कोणालाही दयामाया नाही. अगदी पंतप्रधानांच्या सचिवांची चुकीच्या जागी लावलेली गाडीही तिचे सहकारी निर्मलसिंग यांनी क्रेनने उचलून नेण्याचं धाडस केलं ते तिच्या पाठिंब्यामुळेच. तिच्या या अथक प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश आलं. दिल्लीची वाहतूक सुरळीत झाली. सामान्य जनता तर तिला ‘क्रेन बेदी’ म्हणून संबोधे!
कोण ही क्रेन बेदी! ही किरण बेदी. भारतातली पहिली स्त्री पोलिस अधिकारी.
किरण अमृतसरची. ९ जून १९४९ हा तिचा जन्मदिवस. तिच्या वडिलांचे नाव परकाशलाल आणि आईचे नाव प्रेमलता. परकाशलाल अत्यंत संयमी, सहृदय होते. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांना परंपरेने घरी चालत आलेला कापडाचा व्यवसाय फारसा सांभाळता आला नाही. अर्थात त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. प्रेमलताबाई शिकलेल्या होत्या. बेताच्या परिस्थितीतही व्यवस्थित संसार करून त्यांनी मुलींचे शिक्षण, संगोपन केले. त्यांना चार मुली होत्या. चारही मुलींना त्यांनी शिक्षण तर दिलेच पण त्यांच्या खेळाडूवृत्तीला उत्तम खतपाणी घालून टेनिसपटू बनण्यासही प्रोत्साहन दिले. किरणने आपल्या बहिणी शशी, अनू, रिटा यांच्याबरोबर टेनिसची अनेक बक्षिसे मिळवली. टेनिसमधूनच तिला चिकाटी, कष्ट यांचे धडे मिळाले तसेच व्यूहरचना, डावपेच, आयुष्याकडे बघण्याची दृष्टी यांचाही विकास झाला.
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ती एन. सी. सी. त सहभागी झाली होती. खाकी पोशाखाची आवड ही त्यातूनच निर्माण झालेली. तिला एन. सी. सी तले बेस्ट कॅडेड अॅवॉर्डही मिळाले होते. पदबीधर झाल्यानंतर ती अमृतसरच्या कॉलेजमध्ये राज्यशास्त्र या विषयाची प्राध्यापिका म्हणून काम करत होती. त्याचवेळी ब्रिज बेदींशी तिचा विवाह झाला.
१९७२ मध्ये तिची आय. पी. एस. मध्ये निवड झाली. जरी ती परीक्षेत पास झाली असली तरी पोलिसखाते हे पुरुषांचे क्षेत्र आहे. त्याचे शिक्षण खडतर व कठीण आहे, तेव्हा तिने ते क्षेत्र निवडू नये यासाठी मुलाखतीमध्ये तिला वारंवार सांगण्यात आले. पण किरण निश्चयापासून दूर झाली नाही. ती माऊंट अबू इथल्या नॅशनल पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी गेली, आणि तिने उत्तम यशही मिळवले. १९७५ पासून उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून तिची कारकीर्द सुरु झाली.
गोव्यात चोगम परिषद भरणार होती. त्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अनेक परदेशी मान्यवर मंडळी गोव्यात येणार होती. वाहतूक व्यवस्था किरण बेदीकडे होती. विमानतळापासून त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंतचे अंतर होते ४० कि. मी. किरणकडे पोलिस संख्या कमी होती. तिने शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांची मदत घेतली. १२०० विद्यार्थी वाहतूक नियमनाच्या कामाला लागले. त्यांना प्रशिक्षण दिले. एन. सी. सी. चे हे विद्यार्थी विद्यार्थिनी निळा पांढरा - गणवेश, पांढरे बूट मोजे, डोक्यावर गोल्फकॅप्स आणि गळ्यात शिट्टीची लाल दोरी अशा थाटात मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या गल्ली बोळांवर व्यवस्थित लक्ष ठेवत होते. मुख्य रस्त्यावर विशिष्ट अंतरावर रांगेत उभे होते. इंदिरा गांधींबरोबर राणी एलिझाबेथ, मार्गारिट थॅचर, कॅनडाचे अध्यक्ष त्रुदेऊ इ. मान्यवर मंडळींची वाहने मुख्य रस्त्यावरून जात असताना हात हलवून त्यांनी त्यांचे स्वागत केले. इंदिराजींनी वाहने थांबवून विद्यार्थ्यांना 'हॅलो' केले. हा त्या विद्यार्थ्यांना आयुष्यभरातील अविस्मरणीय आनंद मिळाला. गोव्याच्या राज्यपालांनी खास पत्र पाठवून किरण बेदींचे, पोलीस दलाचे, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फक्त दहशतीने सुधारणा होत नाहीत तर त्यासाठी वेगवेगळ्या सोयी. कराव्या लागतात. वेगळे मार्ग काढावे लागतात. वेगळे प्रयोग करून पाहावे लागतात ही किरण बेदींची धारणा. त्यांनी आपल्या कारकिर्दीत याचा यशस्वीपणे उपयोग करून दाखवला आहे.
किरण दिल्लीत असतानाची गोष्ट. पोलिस आणि सामान्य जनता यांच्यात सहकार्याची देवाणघेवाण व्हावी म्हणून दिल्लीच्या पश्चिम जिल्ह्यात किरणने नवी योजना आखली. प्रत्येक हवालदाराला लहान लहान भागाचा ताबा दिला, आणि त्या भागात एक छोटेसे लाकडी घर उभारून दिले. या घराला नाव दिले 'बीट बॉक्स'. हे त्याचं ऑफीस. त्या भागातल्या नागरिकांची जबाबदारी त्या हवालदारावर. त्यांच्या तक्रारी तिथे सोडवल्या जायच्या त्यामुळे पोलिस स्टेशनचा कामाचा ताण, जनतेचा त्रास, वेळ, पैसा सारेच वाचलं. आपल्या घराजवळ पोलिस आहे या गोष्टीचा नागरिकांना दिलासा मिळू लागला. गुंडगिरी कमी झाली. छोट्या मारामाऱ्या, भांडणं तिथंच मिटवली
जायची. पोलिसांना आत्मविश्वास, सन्मान मिळाला. पोलिस खूष जनता खूष, परंतु वकील लोक संतापले. त्यांना केसेस मिळेनाशा झाल्या.
नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात महानिरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर तर तिची योग्यता योग्य प्रकारे सिद्धच झाली. पोलिस सेवेत तिहार कारागृहातील नियुक्ती ही कमी प्रतीची मानली जायची. तिथल्या कामकाजाबद्दल गुप्तता पाळली जायची. कैद्यांना जनावरांप्रमाणे वागवले जायचे. कर्मचारी उद्धट, उर्मट, शिवीगाळ करणारे, हुकूमशाही वृत्तीचे होते. कैद्यांना कायम बंदिस्त ठेवत, कर्मचारी आणि कैदी या दोन परस्परविरोधी शक्ती होत्या. त्यांच्यात एकमेकांबद्दल अविश्वासाची भावना होती.
किरणने सर्वप्रथम कैद्यांना होणारी मारझोड बंद केली. त्यांच्या तक्रारींना दाद दिली. कर्मचारी वर्गाला 'आपण कैद्यांचे केवळ शरीररक्षक आणि ताबेदार आहोत, त्यांच्या सुरक्षेची आणि कल्याणाची काळजी घेणे हेच आपलं काम आहे.' याची जाणीव करून दिली. दुपारचे जेवण उप-महानिरीक्षक आणि इतर चार अधीक्षक यांच्याबरोबर घेण्यास तिने सुरुवात केली. जेवता जेवता चर्चा करून महत्त्वाच्या प्रश्नांवर उपाय शोधले. तिहार तुरुंगाला सुधारसंस्था करण्याचे प्रयत्न तिने सुरू केले.
तिहार तुरुंग १८० एकर जागेत पसरलेला, चार स्वतंत्र तुरुंग असलेला,उंच भिंतींनी बंदिस्त असलेला सर्वाधिक सुरक्षित तुरुंग आहे. जवळ जवळ ९००० कैदी यात असतात. सशस्त्र पोलिसांची गस्त, उंचावर लाकडी खोल्यातून स्वयंचलित शस्त्रधारी, भयावह दिसणारे पहारेकरी, मजबूत लोखंडी गज, मोठ्या आकाराची जाड, चपटी कुलपे, भक्कम पोलादी दरवाजे धडकी भरावी असंच रूप. पण किरणने तुरुंगाची भयानकता पार बदलून टाकली.
पृथ्वीवर नरक निर्माण करण्यासाठी जे लागतं ते सगळं या तुरुंगात होतं. कैद्यांना, विडी, सिगारेट, दारु अंमली पदार्थ सारं काही मिळायचं. नुसतं कोंडलेलं अशांत मन, रिकामे हात आणि भडकलेलं डोकं त्यामुळे मारामाऱ्या, उद्दामपणा त्यासाठी शिक्षा हे सत्र चालूच राहायचं. किरण तिहारच्या चारही तुरुंगांतून दिवसा, रात्री वरचेवर फेऱ्या मारू लागली. तिने अमली पदार्थांच्या समस्येला प्राधान्य दिले. त्यासाठी लागणारी औषधे मागवली. एका वॉर्डाचे रूपांतर व्यसनमुक्ती केंद्रात केले. अमली पदार्थ तुरुंगात येणाऱ्या चोरवाटा बंद केल्या. कैद्यांना विडी, सिगारेट देणं बंद केलं. कारागृहात धूम्रपानावर बंदी आणली. कैद्यांची मनं वळविण्यासाठी त्यांच्यापुढे भाषणे करून त्यांना आपला हेतू समजावून दिला. साक्षरता मोहिमेसाठी सुशिक्षित कैद्यांना शिक्षक केले. कैद्यांना अभ्यासवर्गाची सवय लावली. आता कैदी अभ्यास, योगासने, विणकाम, शिवणकाम, टी. व्ही. दुरुस्ती अशा कामात मग्न होऊ लागले. बराकींमधून वेगवेगळ्या धर्मांच्या प्रार्थना, गीते यांचे आवाज येऊ लागले.
'विपश्यना साधना संस्थान' ने किरणशी संपर्क साधला आणि कैद्यांना आत्मशोध, चित्तशुद्धी, शुद्ध, शांत, सुखी होण्याचा मार्ग गवसला. ‘विपश्यना’मुळे कैद्यांची आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांचीही विचारशक्ती आणि वागणूक चांगली झाली.काही काळ डाकू फुलनदेवी या तुरुंगात होती. तिला लिहा वाचायला याच तुरुंगाने शिकवले. ती हलकी फुलकी पुस्तके वांचू लागली.
१९९३ मध्ये मुलांसाठी दोन विभाग (मुंडाखाना) सुरू करण्यात आले. 'कांबळी वॉर्ड', 'सचिन वॉर्ड' अशी क्रिकेटपटूंची नावे त्यांना दिली. या किशोरवयीन गुन्हेगारांना चांगल्या वाईटाची जाण देऊन त्यांची शक्ती विधायक कार्याकडे वळवली.
सुरक्षा आणि देखरेखीच्या कामावर तिहारमध्ये दीडहजार अधिकारी आणि जवान आहेत. त्यांचे कल्याण हाही तुरुंग प्रशासनाचाच एक अविभाज्य भाग आहे हे लक्षात घेऊन किरणने सेवकवर्गासाठीही अनेक उपक्रम राबवले. कर्मचाऱ्यांच्या स्त्रियांना कौशल्याची कामे शिकवून त्यांच्या कुटुंबाची मिळकत वाढविणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवून कुटुंबाबरोबर त्यांना अधिक वेळ घालविता यावा अशी योजना करणे अशा गोष्टींकडेही तिने लक्ष पुरवले. हे सारे करत असतानाच ‘अंमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार' या विषयात संशोधन करून तिने डॉक्टरेट मिळविली.
तिच्या कार्यालां मानसन्मानही मिळाले. राष्ट्रपतींकडून 'पोलीस शौर्यपदक’, नॉर्वेच्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ गुड टेमप्लार्स' या संघटनेतर्फे अंमली पदार्थ प्रतिबंध क्षेत्रात मोलाचे कार्य केल्याबद्दल 'एशिया रीजन अॅवॉर्ड', फिलिपिन्सच्या रेमन मॅगसेसे फौंडेशनचे रेमन मॅगसेसे अॅवॉर्ड फॉर गव्हर्मेन्ट सर्व्हिस' हे पारितोषिकही मिळाले.